फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
होळी रे होळी पुरणाची पोळी” ..
किंवा
होळीला गवऱ्या पाच पाच डोक्यावर नाच नाच
लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे. होळी आपल्याला त्याग आणि समर्पण शिकवते. ह्या उत्सवाला होलिकादहन किंवा होळी शिमगा हुताशनी महोत्सव दोलायात्रा कामदहन अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत.
ह्या होळी बद्दल अनेक लोककथा प्रचलीत आहेत. कोकणात ह्या होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी की :
एकदा काय झालं, एका गावांत एक राक्षसीण आली. ती गावांतल्या लहान मुलांची हत्या करू लागली. गावावरच्या ह्या संकटावर काय उपाय करायचा म्हणून सारा गांव एकत्र जमला. त्यांनी काय केले गावाच्या वेशीवर आणि प्रत्येक घराच्या अंगणांत होळ्या पेटवल्या. साऱ्या गावांत होळ्या पेटलेल्या पाहताच ती राक्षसीण जरा घाबरलीच तरीही ती पुढे पुढे येऊ लागली. मग लोकांनी नाचायला, बोंबा मारायला, वाद्य वाजवायला, त्या राक्षसीणीला शिव्या द्यायला सुरवात केली. लोक तिच्या भोवती कोंडाळे करून नाचू लागले. तो आवाज , तो दारादारांतला अग्नी, तो लोकांचा राग, त्यांचं बोंबा मारणं हे सर्व पाहून ती राक्षसीण घाबरली तिनं त्या गावातून काढता पाय घेतला.
राक्षसीण गावातून जाताच लोक त्याच होळी भोवती आनंदानं नाचू लागले. गावाचं संकट दूर करणाऱ्या त्या अग्नी देवतेचं सर्वांनी पूजन केले. तिला गोडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून कोणत्याही दुष्ट असुरी शक्तीनं गावांत, घरांत इतकांच नव्हे तर माणसाच्या मनांत ही प्रवेश करू नये म्हणून होळीची प्रथा रूढ झाली.
खरं म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी त्या शांत झालेल्या होळीची राख अंगाला लावायची, ती कां? तर पुढे सुरू होणारा कडक उन्हाळा सहन व्हावा ह्यासाठी. पण हा चांगला विचार अंगाला चिखल लावायचा, घाण पाणी, एकमेकांच्या अंगावर टाकायचं ह्या आणि अशा ओंगळ कृतीमुळे मागे पडला. आपण ही जे चांगल आहे तेच घ्यायला हवं नाही कां?
॥ महाराष्ट्रातील संत ॥
Blogs
-
गुढीपाडव्याचे महत्त्व
-
गुरुपौर्णिमा
-
मकरसंक्रांत