संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म:अज्ञात वर्ष - मृत्यू: इ.स. १३३८) हे यादव काळातील संत नामदेव यांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते. संत चोखामेळा यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळा यांचे कुटुंब हे जातीने महार होते. संत चोखामेळा यांचा जन्म पंढरपूरला झाल्याचे संत महिपती सांगतात. संत चोखामेळा मूळ वर्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. संत चोखामेळा यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांची हाडे ओळखून ती गोळा केली व पंढरपूरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वर यांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे संत चोखामेळा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
संत चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ. ते उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत, पण ते विठ्ठलाच्या नामात सतत दंग असत. गावगाड्यातील शिवाशिवीच्या वातावरणात त्यांचा श्वास कोंडला जात होता. दैन्य, दारिद्र्य, र्वैफल्य यांमुळे ते लौकिक जीवनात अस्वस्थ होते. परंतु प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना जवळ केले, त्यांना संतसंग लाभला. त्यांना मंदिरांत प्रवेश नव्हता. श्रीविठ्ठलाला त्यांना इतरांप्रमाणे उराउरी भेटावे असे खूप वाटत होते. परंतु ते सावळे, गोजिरे रूप महाद्वारातूनच पाहावे लागे, ही खंत त्यांच्या मनात होती.
चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आध्यात्मिक लोकशाही संत ज्ञानेश्वर यांच्यामुळे १३व्या शतकात उदयाला आली. म्हणून संत चोखामेळा म्हणतात, ‘खटनट यावे, शुद्ध होऊनी जावे। दवंडी पिटीभावे डोळा।।’ ... असा पुकारा करून त्यांनी वारकरी संप्रदायातील अध्यात्मनिष्ठ, अभेद भक्तीचे लोण आपल्या उपेक्षित बांधवांपर्यंत नेऊन पोहोचवले. आत्मविकासाची संधी तत्कालीन समाजरचनेतील अगदी तळातील लोकांनाही मिळावी असे संत ज्ञानेश्वर आदी सर्वच संतांना प्रांजळपणे वाटत होते. त्याच वेळी संत चोखामेळा यांनी भक्तिमार्गाचा संदेश आपल्या अभंगांतून समाजबांधवांना दिला.
संत चोखामेळा यांचे भावविश्व अनुभवण्याचा प्रयत्न केला असता, एक मूक आक्रंदनाचा अनुभव येतो. संस्कारसंपन्न, संवेदनक्षम, भक्तिप्रवण, आत्मनिष्ठ व्यक्तिमत्त्वाच्या संत चोखामेळा यांच्या रचनांतून, त्यांच्या आंतरिक वेदनांचे सूर छेडलेले जाणवतात. ‘हीन मज म्हणती देवा। कैसी घडो तुमची सेवा।’ असा उपरोधिक प्रश्र्न ते देवालाच विचारतात. ‘का म्हणून आम्ही या यातना सहन करावयाच्या, भगवंताच्या लेखी सर्व त्याचीच लेकरे आहेत ना, मग असा दुजाभाव का?’ असे प्रश्र्न त्यांच्या मनात निर्माण होऊन ते व्यथित होताना दिसतात. त्यांच्या अभंगरचना हृदयाला भिडणार्या आहेत. त्यांना भोगावे लागलेले दुःख, त्यांची झालेली अक्षम्य उपेक्षा, मानसिक छळ याचे पडसाद भावविभोरतेसह त्यांच्या काव्यरचनेत अभिव्यक्त झालेले दिसून येतात. संत चोखामेळा यांचे सुमारे ३५० अभंग सध्या उपलब्ध आहेत. त्यांचे अभंग लिहून घेण्याचे काम ‘अभ्यंग अनंतभट्ट’ हे करत असत, असा उल्लेख काही संशोधक करतात.
संत चोखामेळा यांच्या रचनांत भक्ती, तळमळ, आध्यात्मिक उंची तर दिसेतच, तसेच उपेक्षेची खंत जाणवते आणि ‘वेदनेचा जो सूर’ लागलेला दिसतो, तो अंत:करण हेलावून टाकतो.
त्यांच्या कुटुंबातील सर्वच जण हरिभक्तिपरायण होते. त्या सर्वांचे विठ्ठलावर अनन्यसाधारण प्रेम होते. त्यांची पत्नी सोयराबाई हिचे बाळंतपण स्वतः विठाई माऊलीने नणंदेचे रूप घेऊन केले अशी कथा प्रचलित आहे. संत चोखामेळा यांचा मुलगा कर्ममेळा हा पण संत परंपरेत आहे. सोयराबाई व कर्ममेळा यांच्याही काही सुंदर अभंग-रचना आहेत. संत चोखामेळा यांचे मेव्हणे बंका महार व बहीण निर्मळा यांच्याही काही उत्तम रचना आहेत. संत चोखामेळा यांच्या भक्तीची उंची फार मोठी होती. ते स्वतःला ‘विठू पाटलाचा बलुतेदार समजत असत.
संत चोखामेळा मंगळवेढ्याचे होते. त्यांना उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची सतत चिंता होती. त्यांना समान-हक्क मिळावेत, समाजातील तेढ कमी व्हावी, जातींमधील संघर्षाची भ्रामक कल्पना नष्ट व्हावी यासाठी त्यांनी भक्तिमार्गाद्वारे प्रयत्न केले.
गावगाड्यातील गावकुसाचे काम चालू असताना एका दुर्दैवी अपघातात त्यांचा अंत झाला, असे उल्लेख त्यांच्याविषयीच्या लेखनात आढळतात. संत नामदेव यांनी त्यांच्या सर्व अस्थी गोळा केल्या. त्यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा नाद त्यांनी ऐकला. संत नामदेव यांची महाद्वारात जिथे पायरी आहे, त्याच्या बाजूला संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूरमध्ये आहे.
संत चोखामेळा यांच्या मनात जातिहीनत्वाची झोंबणारी जाणीव असतांनाही ते ते चोख (स्वच्छ) होते. कोणताही संत जन्मतः संत असत नाही. 'संतत्व' ही प्राप्त केलेली मनोवस्था आहे. हे त्यांच्यावरून निदर्शनास येते.
'शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा' अशी आपल्या नावामागे ते शुद्धत्वाची ग्वाही देऊन. देहभाव नष्ट झाल्याचे सांगतो. मेळा (अपवित्र) असणारा माणूसही भगवंताच्या दारी (चोख) पवित्र होतो. संत चोखामेळा यांनी 'वाणी नाही शुद्ध | धड न ये वचन' असे आपल्या अभंगात म्हटले असले तरी, तो त्यांचा विनय आहे. त्यांची अभंगवाणी निर्दोष असलेली दिसते. व्याकरण, विवेचन आणि वाङ्मय या तीनही दृष्टीनी त्याची वाणी चोख आहे. उत्कटता, सामाजिक आशय, बांधीव रचना, या गुणांमुळे त्यांच्या अभंगाला मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त झाले आहे.
नामदेवप्रणीत भक्तियात्रेत संत चोखोबा, पत्नी संत सोयराबाई , बहीण निर्मळा, पुत्र कर्ममेळा आणि मेहुणा बंका हे कुटुंबीय सहभागी झाले होते. नामदेवाप्रमाणे समग्र कुटुंबच भक्तिभावात एकरूप झाले दिसते.
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई
-
संत गोरा कुंभार
Blogs
-
Ekadashi 2022
-
वैकुंठ चतुर्दशी
-
पंढरपूर पालखी