संत एकनाथ

॥ संत एकनाथ माहिती ॥

संत एकनाथ

मूळ नाव : एकनाथ

जन्म : इ.स. १५३३, पैठण, औरंगाबाद जिल्हा,महाराष्ट्र

मृत्यू : इ.स. १५९९

भाषा : मराठी

वडील : सूर्यनारायण

आई : रुक्मिणी

पत्नी : गिरिजा

अपत्ये : गोदावरी, गंगा व हरी

संत एकनाथ(१५३३-१६००) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला.

शांतिब्रह्म, 'संत 'पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह 'ज्ञानाचा एका ' या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल.

संत एकनाथ यांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच संत एकनाथ यांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव.

संत एकनाथ यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ यांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. संत एकनाथ यांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती.

संत एकनाथ यांचे गुरू सद्गुरू जनार्दनस्वामी हे देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. हे मूळचे चाळीसगावचे रहिवासी; त्यांचे आडनाव देशपांडे होते. ते महान दत्तोपासक होते. सद्गुरू म्हणून संत एकनाथ यांनी त्यांना मनोमन वरले होते. जनार्दनपंत हे विद्वान व सत्शील आचरणाचे होते. संत एकनाथ यांनी अथक परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले, असे म्हणतात. आत्मबोध, पूर्णगुरुकृपा, आणि भगवंत दत्तात्रेय यांचे दर्शन यांमुळे संत एकनाथ यांचे जीवन धन्य झाले. संत एकनाथ यांनी अनेक तीर्थयात्राही केल्या.

संत एकनाथ यांनी एका सद्गुणी व सुलक्षणी मुलीशी विवाह केला. ही मुलगी पैठणजवळच्या वैजापूरची होती. संत एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली व हरी नावाचा मुलगा झाला. त्यांचा हा मुलगा हरिपंडित या नावाने प्रख्यात झाला. तो परंपरेचा अतिशय अभिमानी होता. त्याने संत एकनाथ यांचे शिष्यत्व पत्करले. संत एकनाथ यांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी संत एकनाथ यांच्या पादुका दरवर्षी आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.
कवी मुक्तेश्वर हे नाथांचे मुलीकडून नातू होत.

संत ज्ञानेश्वर यांच्या नंतर सुमारे २५० वर्षांनी संत एकनाथ यांचा जन्म झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. यवनांचे राज्य होते. याच दरम्यान विजयनगरचे हिंदू साम्राज्य बुडाले होते. संपूर्ण समाज कर्तव्यच्युत झालेला होता. स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वराज्य यांविषयी सर्वत्र अज्ञानाचे वातावरण होते. कर्मकांड, कर्मठपणा यावर जास्त भर होता. भर दिवसा स्त्रिया बाटविल्या जात होत्या. धर्मावर अत्याचार होत होता. अशा बिकट समयी संत एकनाथ यांनी समाज सुधारण्यासाठी जगदंबेला साद घातली. 'बये दार उघड ' असे म्हणत संत एकनाथ यांनी भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने जनजागृती केली. संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. रंजन व प्रबोधन करत अध:पतित समाजाला त्यांनी सन्मार्गावर आणले, महाराष्ट्राचा पुरुषार्थ जागविला. ते 'एका जनार्दन ' म्हणून स्वतःचा उल्लेख करतात, एका जनार्दनी ही त्यांची नाममुद्रा आहे.

अनेक रचना, अभंग, गवळणी असे स्फुट लेखन त्यांनी केले. 'एकनाथी भागवत ' हा त्यांचा ग्रंथ लोकप्रिय आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण १३६७ श्र्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून १८,८१० ओव्या संत एकनाथ यांनी लिहिल्या आहेत. मूळ भागवत १२ स्कंदांचे आहे. हे (व्यासकृत) काव्य अतिशय प्रासादिक आहे. संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे ४० हजार ओव्या आहेत. त्यांचे रुक्मिणीस्वयंवरअत्यंत लोकप्रिय होते. संत एकनाथ यांची दत्ताची आरतीही (त्रिगुणात्मक त्रयमूर्ति दत्त हा जाण) प्रसिद्ध आहे. या महात्म्याने विपुल वाङ्मय निर्माण करून मराठी भाषा समृद्ध केली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध केली. संत एकनाथ हे महावैष्णव होते. दत्तभक्त होते, देवीभक्त पण होते. जातिभेद दूर करण्यासाठी यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२५ फेब्रुवारी इ.स. १६००) या दिवशी संत एकनाथ यांनी देह ठेवला. फाल्गुन वद्य ष्ष्ठी हा दिवस एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो.

॥ संत एकनाथ अभंग ॥

whatsApp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.