संत कान्होपात्रा

॥ संत कान्होपात्रा माहिती ॥

पंढरपूर पासून १४ ते १५ मैलावर मंगळवेढा हे गाव आहे. त्या गावामध्ये शामा नावाची एक सुंदर वैश्या राहत होती. 
शामा कडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते. अनेक मुस्लिम सरदारांना, अमिर उमरावांना खुश करण्याचे काम ही शामा करीत असे. 
शामा ला एक मुलगी होती ती शामा पेक्षा नव्हे तर एका अप्सरेपेक्षा ही खूप सुंदर होती, तिचे नाव कान्होपात्रा. 
व्यवसायासाठी शामा ने कान्होपात्रेला नाचणे व गाणे या दोन्ही कला शिकवल्या. 
लावण्यवती असली तरी समाजात त्यांना काही स्थान नव्हते. तरी शामा ला तिची मुलगी राजवाड्यात राहण्या योग्य आहे असे वाटत होते. 
शामा ने तिला राजदरबारी घेऊन जाण्याचे ठरवले. त्यावर कान्होपात्राने सांगितले माझ्यापेक्षा गुणवान आणि राजबिंड्या मुलालाच मी पसंद करेन. 
मला माझ्या योग्यतेचा कोणताच पुरुष दिसत नाही. कान्होपात्रेने शामा च्या निर्णयाला नकार दिला. 
एके दिवशी कान्होपात्रेच्या दारावरून वारकऱ्यांची दिंडी ताल मृदूंगाच्या तालावर राम कृष्ण हरी च्या गजरात विठ्ठलाचे भजन करीत चालली होती.  
कान्होपात्रेने त्यांना विचारले "तुम्ही एवढे तल्लीन होऊन कोणाचे भजन कीर्तन करत आहात." 
त्यावर वारकरी कान्होपात्रेला म्हणाले "आम्ही वैकुंठाचा राजा, सावळ्या सुंदर अश्या पंढरपूरच्या विठ्ठलाला भेटण्यासाठी चाललो आहोत." 
विठ्ठलाच्या रूप गुणाचे वर्णन ऐकून कान्होपात्रेने वारकर्यांना विचारले "तुम्ही वर्णन केलेला ऋषी माझा अंगीकार करेल का?"
"का नाही आमचा विठोबा तुझा अंगीकार नक्कीच करेल. तू एकदा त्याला पहिले तर तू त्याचीच होशील" असे वारकऱ्यांचे बोलणे ऐकून कान्होपात्रा वारकऱ्यांसोबत पंढरपूरला निघाली. 
राम कृष्ण हरी विठ्ठलनामाचा गजर करीत कान्होपात्रा पंढरीला आली. मंदिरात जेव्हा तिला विठ्ठलाचे दर्शन झाले तेव्हा ती स्वतःला पूर्णपणे विसरली आणि पंढरपुरातच राहिली. 
कान्होपात्रा रोज विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर महाद्वाराजवळ कीर्तन करू लागली. दिवस असेच जाऊ लागले.
एके दिवशी एका इसमाने यवनी बादशाह जवळ कान्होपात्रेच्या लावण्याचे वर्णन केले. बादशहाने दूत पाठवून तिला घेऊन यायला सांगितले. 
कान्होपात्रेला न्यायला शिपाई पंढरपुरात आले व ते कान्होपात्रेला म्हणाले "बादशहाने तुला बोलावले आहे चल आमच्यासोबत"
"जर तू आली नाही तर आम्हाला तुला जबरदस्तीने न्यावे लागेल." घाबरलेली कान्होपात्रा बोलली "थांबा मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेऊन येते." 
कान्होपात्रा थेट मंदिरात गेली आणि डोके टेकवून विठ्ठलाचा धावा करू लागली. 
"पांडुरंगा माझे रक्षण कर, सर्वांच्या मदतीला तू धावून येतोस मग माझ्या मदतीला का येत नाही. जर हे शिपाई मला घेऊन गेले तर सार्वजनांचा तुझयावरचा विश्वास कायमचा उडेल."
"आता माझा अंत पाहू नकोस" असे म्हणत कान्होपात्रा विठ्ठलाचा धावा करू लागली 

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सवर्था जाऊ पाहे

हरीणीचे पाडस व्याघ्रे धरियेले
मजलागी जाहले तैसे देवा

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलुनी आस, जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयास

पांडुरंगा मी माझ्या आशा इच्छा सर्व सोडल्या आहेत आतातरी घेई कान्होपात्रेस हृदयास हि कान्होपात्रेची विनवणी फळाला आली. 
कान्होपात्रेचे शुद्ध हरपले आणि विठ्ठलाच्या पायाजवळ ठेवलेले डोके तिने वर उचललेच नाही विठ्ठलाच्या चरणी तिने प्राण सोडला. 
मंदिराच्या पुजाऱ्यांनी हे पाहिल्यावर त्यांनी घाईगडबडीने कान्होपात्रेला देवळाच्या आवारात दक्षिण दारी पुरले. 
आणि काय चमत्कार लगेच तेथे तरटीचे झाड उगवले. विठ्ठल मंदिराच्या आवारात आजही तेथे तरटीचे  झाड आहे. कान्होपात्रेला मंदिरात समाधी घेण्याचे भाग्य लाभले. 
विठ्ठलाच्या सानिध्यात, मंदिराच्या परिसरात, महाराष्ट्रातील फक्त्त एकाच संतांची समाधी आहे ती म्हणजे संत कान्होपात्रा. 

॥ संत कान्होपात्रा अभंग ॥

Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.